रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Sunday, March 4, 2012

गंधर्व : ब्लर्ब

पॉप्युलर प्रकाशन. मुखपृष्ठ- बाळ ठाकूर
१९६० मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाची ही दुसरी आवृत्ती (१९९२). सदानंद रेगे यांच्या व्यक्तित्वाची ठेवणच स्वतंत्र असल्यामुळे त्यांचे अनुभवविश्वही तेवढेच स्वतंत्र असणे स्वाभाविक आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहातील कवितांतून त्यांच्या प्रतिभेचे रूपदर्शन घडते. जाणिवांच्या चक्रव्यूहातून जाताना रेग्यांची प्रतिभा एवढ्या दृत गतीने व सफाईने पदन्यास करीत जाते की तिच्याबरोबर धावता धावता मनाला भोवळ यावी कधी ती एवढी व्यापक होते, कधी आपणास एवढ्या उंचीवर घेऊन जाते की त्यानंतर आपल्या सामान्य जाणिवांच्या जगात परतताना एक मानसिक हादरा सहन करावा लागतो; कधी तिच्यातील सौंदर्यरूप झालेली अपार कणव शब्दाशब्दातून मनात ठिबकू लागते. रेग्यांच्या या नाजूक व रसरसलेल्या जाणिवा मनातून देखणा अंकूर फुटावा इतक्या सहजतेने व्यक्त होतात. स्वतंत्र जाणिवा आणि त्यांची स्वतःची अशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती यांमुळे रेग्यांची कविता जीवनाशी एक नाते निर्माण करते.

No comments:

Post a Comment

मित्र