रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Friday, March 2, 2012

सदानंद रेगे यांचे काव्यविश्व

म. सु. पाटील यांनी ‘सदानंद रेगे यांचे काव्यविश्व’ (प्रतिमा प्रकाशन, पुणे) असं एक पुस्तक लिहिलंय. रेग्यांच्या कवितांचा अर्थ, त्यातल्या प्रतिमा, विषय असा एक आढावा सव्वाशे पानांच्या नि चाळीस रुपये किंमत असलेल्या या पुस्तकात आहे. पुस्तकाची आवृत्ती १० ऑक्टोबर १९८९ला प्रकाशित झाली होती.
या पुस्तकातला अगदीच थोडा भाग संदर्भासाठी आणि थोड्याशा स्पष्टीकरणासाठी इथे –


    या अभ्यासात जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेगे हे फार सचोटीने लिहिणारे कवी आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेगे हे फार सचोटीने लिहिणारे कवी आहेत. काव्य हा जणू त्यांनी स्वात्मसाधनेसाठी निवडलेला उपासनामार्ग आहे. पारमार्थिक साधनेत माणसाला बद्ध, मुमुक्षू, साधक या अवस्थांतून जावे लागते. या साधनेत जी बद्धतेची जाणीव असते तीतच तीमधून बाहेर पडण्याच्या इच्छेचे, मुमुक्षेचे बीज असते. मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा, बद्धतेतून मुक्त होण्याची, तिच्यावर मात करण्याची, तिच्या पलीकडे जाण्याची, अतीत होण्याची इच्छा. पण केवळ अशी इच्छा असणे पुरेसे नसते. ती कृतीमध्ये परिणत व्हावी लागते. अशा इच्छेने केलेल्या कृती हीच माणसाची साधना असते. अशी साधना करणारे सगळेच साधक सिद्ध या अखेरच्या पायरीपर्यंत पोचतातच असे नाही; तरीही साधनेतून मिळणारे समाधान काही कमी नसते. रेगे यांनी आपल्या कवितांतून काव्याविषयीची आपली भूमिका स्पष्टपणे अशी कोठे मांडलेली नाही. त्यांचा शब्दांसंबंधीचा दृष्टिकोन मात्र एका कवितेत व्यक्त झालेला आहे. त्याचे निमित्त आहे हेंमिंग्वे या प्रसिद्ध अमेरिकी कादंबरीकाराचे पुढील शब्द :
‘Obscenity, I obscenity in the obscenity of thy obscenity.’
ते वाचून रेगे यांच्यामधील कवी विचारतो :
        शब्द बिचारे
        भोळेभाबडे असतात
        त्यांची एवढी परवड कशासाठीं?

                            (देवापुढचा दिवा)
आणि सांगतो
        डागळलेलीं अंगवस्त्रं मात्र
        त्यांवर टांगूं नका
        खुंट्या असल्या तरी
        त्या सतारीच्या आहेत
        शब्द...
        स्वरपुष्पांचे अक्षर झुबके...
        क्रौंचमिथुनाच्या वेळचें आर्त
        तुमच्या वृंदावनांत आणून टाकणारीं पाखरं.

                            (देवापुढचा दिवा)
यातील रूपके पाहिली की या कवीच्या शब्दांबाबतच्या संवेदनशीलतेची कल्पना येते. त्यात श्रद्धेचा सूर ठळकपणे जाणवतो. क्रौंचमिथुनाचा संदर्भ या माध्यमाच्या परंपरेचा जो आरंभबिंदू आहे त्याला स्पर्श करतो आणि त्या संबंधीची आपली साहचर्ये जागवतो. ‘कधीच नसलेली कविता’ (वेड्या कविता) या कवितेतील शब्दांबाबतचा दृष्टिकोन निराळा आहे. या कवितेचा आरंभ पुढीलप्रमाणे आहे.
        कोरा कागद
        त्याहून कोरंकरकरीत मन
        साऱ्या त्रिमितीत शब्द दबा धरून बसलेले
        केव्हा काय होईल याचा नेम नाही

हे चित्र निर्मितीच्या अगोदरच्या अवस्थेचे सूचक दिसते. त्यात एक विरोध आहे. एकीकडे कागद आणि मन यांचा कोरेपणा सगळीकडे सामसून झाल्याची सूचना देणारा आहे; त्या पार्श्वभूमीवर दबा धरून बसलेले शब्द अत्याचाराच्या तयारीत असल्यासारखे वाटतात. दुसरीकडे ‘कोरंकरकरीत मन’ हे ‘नथिंगनेस’च्या जाणिवेचे स्मरण करून देते. ते शून्यवत झालेले आहे, म्हणूनच त्याची एक नवी संभवशक्यता साक्षात होण्याची ही वेळ आहे असे वाटते. पण दबा धरून बसलेले शब्द तिचा गळा दाबतील की काय याचे भयही निर्माण होते, किंबहुना ते चराचर व्यापून टाकते. ही कल्पना देवकीची अपत्ये जन्माला येताच मारणाऱ्या कंसाच्या अनुयायांची आठवण करून देते. ‘कुठं तरी क्लिक होतं’ या प्रतिमेतून कवितेचा जन्म सूचित केला जातो. शेवटी झुडपांतून ऐकू येणारी जीवघेणी किंकाळी कवितेचा गळा घोटल्याची सूचकक बनते. येथे नवी संभवशक्यता आणि जुने शब्द किंवा तिला सामावून घेणाऱ्या माध्यमाचा अपुरेपणा, त्यामुळे त्याचा तिच्यावरील अत्याचार आणि परिणामी कवितेचे निर्जीवपण यासारखी एक जाणीव आविष्कृत होत असल्यासारखी वाटते.
रेगे हे आपल्या कवितेकडे इतक्या गांभीर्याने पाहतात. काव्यनिर्मितीची घटना ही त्यांना अस्तित्त्वानुभव देणारी घटना वाटते. अपत्यसंभवाच्या घटनेने स्त्रीचे अवघे अस्तित्व व्यापले जाते तसा अनुभव ते कवितेच्या निर्मितिघटनेत घेतात.

No comments:

Post a Comment

मित्र