रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Sunday, March 4, 2012

वेड्या कविता : ब्लर्ब

पॉप्युलर प्रकाशन. मुखपृष्ठ - बाळ ठाकूर
प्रिय रेगे
पंधरा एक दिवसांपूर्वी तुमची कितीतरी दिवसांनी अचानक गाठ पडली. तुमच्या हातात तेव्हा ‘वेड्या कविता’ या तुमच्या नव्या संग्रहाचे हस्तलिखित होते. भीतभीतच ते हस्तलिखित दोन चार दिवसांसाठी तुमच्याकडून मागून घेतले आणि काहीशा अनिच्छेने का होईना, पण ते विश्वासपूर्वक तुम्ही दिलेतही. गेल्या काही दिवसांत त्यातील कविता वाचण्यापलीकडे मी इतर काही करू शकलेलो नाही.

तुमच्या ‘वेड्या कविता’ वाचल्यानंतर प्रथम क्षणीच हे जाणवले की, इतक्या ‘शहाण्या कविता’ मराठीत क्वचितच लिहिल्या गेल्या आहेत. या कवितांतील विषय आणि आशय, घाट आणि बांधणी, प्रतिमांचा वापर, मिथचा उपयोग तुमच्या इतक्या यशस्वीपणे अपवादात्मकच झालेला आहे. सर्वार्थाने या कविता मराठी साहित्यप्रांती खऱ्याखुऱ्या ‘नवीन’ आहेत आणि प्रतिभाविष्काराच्या कक्षा त्यांनी निःसंशय विस्तृत केल्या आहेत. एका परीने तुम्ही आपल्या माध्यमाच्या सांकेतिक मर्यादा ओलांडून अनेक वेळा त्यांच्या पलीकडेही पावले टाकण्याचे धैर्य दाखविले आहे. गेली तीन तपे तुम्ही अव्याहतपणे काव्यलेखन करीत आहात आणि अजूनही तो स्त्रोत नवनवोन्मेषांनी अप्रतिहत खळखळत आहे; ही आनंदाची गोष्ट आहे.

प्रस्तुत संग्रहातील ‘वेड्या कविता’, ‘चिनी कविता’, किंग लिअरवरील दीर्घ कविता, मर्ढेकर, दिवाकर, बालकवी, गडकरी, रावसाहेब पटवर्धन, आरती प्रभू यांजवरील कवितांनी प्रत्येक वेळी मन नुसते सुन्न करून टाकले. कितीही वाचल्या तरी मनाचे पुरते समाधान होऊ शकले नाही. बालकवींवरच्या कवितेने तर अक्षरशः भुताटकीच केली... या संग्रहातील प्रत्येक कविता मराठी भाषेचे आगळे लेणेच ठरावे. असेच नवनवोन्मेषशाली लिहीत रहा.
                                                                     
आपला
XX

'वेड्या कविता'ची अर्पणपत्रिका

No comments:

Post a Comment

मित्र